नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी तालुक्यातील काटोल मार्गावरील चक्री घाटात शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.
भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत पहिल्या दुचाकीवरील मंगेश शंकर खाडे (वय ३७) आणि पवन सुनील सेंबेकर (वय २३, दोघेही रा. पोरगव्हाण, जि. अमरावती) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील आकाश वासुदेव जवणे (वय ३२) आणि गौतम श्रावण बागडे (वय २४, दोघेही रा. जलालखेडा, ता. नरखेड) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात चक्री घाटातील वळणावर घडला. ट्रकचालकाने बेपर्वाईने वाहन चालवत विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकींना धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, पहिल्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोंढाळी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, त्याचा शोध सुरू आहे.