मुंबई नाशिक महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झालाय. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. मंगळवारी रात्री मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना कारवर काळाने घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार , मुंबई नाशिक महामार्गावर कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. शहापूर तालुक्यातील कसारा येथील ऑरेंज हॉटेलच्या समोर कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या जवळच्या सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कसारा येथे अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.