छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नाशिकमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांचा मोठा राडा झाल्याचं पहायला मिळत आहे. निष्ठावंतांना डावलून आयारामांना निवडणुकीची संधी दिली जात असल्याने भाजपमधील निष्ठावंत आणि निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारीवरून हा वाद सुरु झाला. तुम्ही सर्व्हेत मागे आहात म्हणून तुम्हांला उमेदवारी नाकारण्यात आली असे सांगण्यात येत आहे.
भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना देखील थांबविण्यात आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत एकच गोंधळ घातला. विल्होळी येथील एका बंगल्यावर एबी फॉर्म वाटपाचे काम सुरु असताना त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यामुळे भाजपमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आल्याचे बघायला मिळाले. शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे एबी फॉर्म असल्याची माहिती मिळताच इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला.
तिकीट मिळत नसल्याने यावेळी कार्यकर्त्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या जुन्या आणि निष्ठावंतांना डावलून काही नवीन आणि बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करूनही संधी मिळत नसेल, तर मेहनतीचे मोल काय? अशी खदखद देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जाहीरपणे प्रकट केली.
दरम्यान, भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी दोन कोटींना तिकीट वाटल्याचा आरोपही यावेळी केला. या घटनेवरून नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.