पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव ट्रेनने तिघांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना मांजरी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळपट्टी परिसरात घडली आहे. पुण्यातील ही रेल्वे अपघाताची घटना रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रथमेश नितीन तिंडे, तन्मय महेंद्र तुपे आणि तुषार शिंदे अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणांची नावं आहेत. हे तिघेही तरुण पुण्यात राहणारे होते. पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तिन्ही तरुणांच्या मृतदेहाचे तुकडे झाले.
रेल्वे अपघाताची माहिती मिळताच हडपसर आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिले आहेत. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. मृत तरुणांच्या कुटुंबीयांना घटनेबाबत कळताच त्यांनी एकच टाहो फोडला.