नाशिक (भ्रमर वृत्तसेवा):- पुणे-नाशिक महामार्गावर बस आणि मालट्रकच्या अपघातात 20 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंचरजवळील नंदीचौक गायमुख येथे आळंदीवरून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी निघालेल्या नागपूर येथील भाविकांच्या एका बसने समोर चाललेल्या मालट्रकला मागून धडक दिली. या अपघातामध्ये बसमधील 30 भाविक जखमी झाले.
आराम खाजगी बस (क्रमांक एमएच 31 ईएम 2786) ही बस भाविकांना आळंदी येथून देवदर्शनासाठी भीमाशंकर येथे जात होती. नंदीचौकात समोर चाललेल्या मालवाहूट्रक (क्रमांक एमएच 12 क़्यू.डब्ल्यू. 8644) ला मागून धडकली. ट्रकमध्ये पुठ्ठ्याचा माल होता. जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉ. साहिल टाके, डॉ. विवेकानंद फसाले, डॉ. अश्विनी घोडे हे जखमींवर उपचार करीत आहेत. अपघातामुळे महिला भाविकांमध्ये घबराट पसरली.
अपघाताची माहिती मिळताच नागपूर अभियंता संघटनेचे सचिव गणेश शहारे यांनी राज्याध्यक्ष सुहास धारासुरकर यांना कळविल्यानंतर, पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उभे यांनी तातडीने मदतीचे चक्र फिरवून भाविकांसाठी जेवण व मुक्कामाची सोय केली. अभियंता अक्षय इंदोरे, उपसरपंच मयूर तांबडे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास भोर यांनी घटनास्थळी जाऊन मानसिक आधार देत तांबडे मळा येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ग्रामस्थांच्या वतीने निवासाची आणि जेवणाची सोय केली. अपघातस्थळी मंचर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.