अलीकडे भरधाव वाहने आणि वाहतूक कोंडी यांच्यामुळे अनेक भीषण अपघाताच्या घटना घडत आहेत. दरम्यान आता जळगावात एक अतिशय थरारक अपघात झाला असल्याची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात कार, एसटी बस आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात ६ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक अतिशय भीषण अपघात झाला. अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ गावाजवळ असलेल्या हॉटेल वृंदावन जवळ कार, एसटी बस आणि मोटरसायकल दरम्यान तिहेरी धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की वाहनांचा पार चक्काचूर झाला.
या अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि एसटी कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत दुचाकीस्वारासह कारमधील महिला आणि पुरुष मिळून एकूण ६ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. कारचा चक्काचूर झाल्याने मृतदेह आतमध्ये अडकले होते, ज्यांना गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी मोठ्या शर्थीने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.