मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करणारी याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारली असून आज दुपारी अडीच वाजता या याचिकेवर तातडीची सुनावणी पार पडणार आहे. अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंच्या मोर्च्याने मुंबईकडे कुच केली असून लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी खंडपीठांसमोर केली होती. न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठाने वैयक्तिक कारणास्तव या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं, अन्यथा येत्या २६ जानेवारीला मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
लाखो मराठा आंदोलकांसह जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कूच सुरू केली आहे. अशातच जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी याचिका सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली होती. ही याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारली असून या याचिकेवर आज दुपारीच मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
त्यामुळे मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाचं काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आरक्षणाची मागणी करून मनोज जरांगे पाटील सरकारला वेठीस धरत आहेत. मराठा आंदोलक मुंबईत आल्यास राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मनोज जरांगेंवर फौजदारी कारवाई करावी, अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी देखील अशीच याचिका दाखल होती, मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती.