राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार, निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचे आज मुंबईत आगमन
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार, निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचे आज मुंबईत आगमन
img
दैनिक भ्रमर
 राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीसह महाविकास आघाडी देखील जोरदार तयारी करत आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालावरुन महायुतीने विधानसभेसाठी जोरात तयारी सुरु केली आहे. पक्षांच्या नेत्यांचे आणि इच्छुकांचे दौरे, सभा आणि बैठका देखील वाढल्या आहेत. दरम्यान आता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे . 


महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे आज रात्री 8 वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीश गर्ग, उपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उपनिवडणूक आयुक्त अजित कुमार, उपनिवडणूक आयुक्त मनोजकुमार साहू, उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार, उपनिवडणूक आयुक्त त्याचबरोबर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.

२७ ते २८ सप्टेंबर या दोन दिवसीय भेटी दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group