
दुबई :- चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) मधील गट टप्प्यातील शेवटचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडला 44 धावांनी नमवत भारताने विजयी हॅटट्रिक केली आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ९ गडी गमावून २४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडचा संघ ४५.३ षटकांत २०५ धावांवर गारद झाला. उपांत्य फेरीत 4 मार्च रोजी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
भारताची सुरुवात खूपच खराब झाली. ३० धावांपर्यंत रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतले होते. विराटच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हा ३०० वा सामना होता. या सामन्यात तो ११ धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल फलंदाजीला आले आणि त्यांनी डावाची जबाबदारी घेतली.
दोघांमध्ये ९८ धावांची भागीदारी झाली. श्रेयस अय्यर ९८ चेंडूत ७९ धावा काढून बाद झाला, तर अक्षरने ६१ चेंडूत ४२ धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला के. एल राहुल २९ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात जलद धावा काढल्या. हार्दिक ४५ धावा करून बाद झाला.
न्यूझीलंड तर्फे मॅट हेनरीने ८ षटकांत ४२ धावा देत ५ बळी घेतले. भारतातर्फे वरूण चक्रवतीने भारतातर्फे 5 बळी मिळवले. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.