आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. महत्त्वाचे पुरावे नाहीत आणि पंचनामा व्यवस्थित झाला नाही, यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मालेगाव स्फोटप्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज निकाल सुनावण्यात आला. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज (31 जुलै) निकाल सुनावण्यात आला. स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.
केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही
बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं. पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने सांगितलं. तपासात अनेक त्रुटी होत्या. पंचनामा योग्य नव्हता. जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही, असं निरिक्षणही न्यायालयाने नोंदवलं. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही, असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेचे दाव्यांवर न्यायालयाचं समाधान झालं नाही. UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे. त्यामुळे UAPA लागू होत नाही. लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवरदेखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आले. आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही, असंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आले.
हे होते संशयित आरोपी -साध्वी प्रज्ञासिंह, प्रसाद पुरोहित, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी,सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, रमेश उपाध्याय
फरार संशयित आरोपी - रामजी कालसंग्रा, शामजी साहू, संदीप डांगे,प्रविण तकलकी