मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेता, लेखक तुषार घाडीगावकरचे निधन झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , तुषार घाडीगावकरने काम मिळत नसल्याच्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
अभिनेता अंकुर वाढवेने इंस्टाग्राम पोस्ट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या दुर्दैवी घटनेने मराठी सिनेविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
तुषार घाडीगावकरने नाटकातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. याशिवाय त्याने अनेक गाजलेल्या मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले होते. लवंगी मिरची, भाऊबळी, उनाड, मन कस्तुरी रे, हे मन बावरे, झोंबिवली, अशा चित्रपटांमध्येही तुषारने भूमिका साकारल्या होत्या.
तुषार घाडीगावकर मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील होता. नाटकातून त्याने अभिनयाला सुरुवात केली होती.
मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्य विभागामध्ये तुषार सक्रिय होता. मित्रांमध्ये ‘घाड्या’ म्हणून तुषार ओळखला जात होता. कॉलेजनंतर मालिका, चित्रपट असा प्रवास तुषारचा प्रवास सुरू झाला होता.
तुषारच्या निधनावर सर्वच कलाकार दु:ख व्यक्त करीत आहेत. तर ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता अंकुर वाढवे यानेही शोक व्यक्त केला आहे.