दसरा मेळाव्याचे निमित्त, शिवाजी पार्कवरुन शिवसेना-मनसे युतीची घोषणा ?
दसरा मेळाव्याचे निमित्त, शिवाजी पार्कवरुन शिवसेना-मनसे युतीची घोषणा ?
img
दैनिक भ्रमर
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते मुंबईत मराठीच्या मुद्द्यावरुन घेण्यात आलेल्या मेळाव्याला एकत्र आल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. शिवसेना-मनसे युतीची घोषणा होऊ शकते अशी शक्यताही दरम्यानच्या काळात अनेकांनी व्यक्त केली. मुबईतील भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सवात सहकुटुंब राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन गणपतीते दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मावशींना भेटायला आलेले पाहायला मिळाले, त्यामुळेही अचानक राजकीय वर्तुळाच राजकीय चर्चा सुरू झाल्या. 

आता, मुहूर्त आहे दसऱ्याचा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती संदर्भात निर्णय झाला नसला तरी प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे युतीचा निर्णय कधी? यावर दसऱ्याचा मुहूर्त साधला जाईल अशी चर्चा होती. दोन भाऊ दसरा मेळाव्याला एकत्र व्यासपीठावर दिसतील, असेही म्हटलं जात आहे. त्यावर, खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 58 वर्षाची परंपरा आहे, या दसरा मेळाव्यात आधी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे विचारांचे सोनं वाटून शिवसैनिकांनी आशीर्वाद द्यायचे. आता, शिवसेना पक्षप्रमुख हे दसरा मेळाव्याला भाषण करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना दिशा देतात आणि विचारांचा सोनं राज्यभरातून आलेला शिवसैनिक दसरा मेळाव्याच्या निमित्ताने लुटतो. त्यामुळे पक्षाच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यासपीठावर येण्याची शक्यता जरी धूसर वाटत असली दसऱ्याच्या सणाला पुन्हा दोन भावांची भेट होण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. मात्र, यावर मनसे नेत्यांकडून जो काही निर्णय असेल तो निर्णय राज ठाकरे घेतील असं उत्तर देण्यात आलं आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरेंचे शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. मनसेच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या भाषणात नेमकं काय बोलतात याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष असेल. यात दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय पक्षाच्या मेळाव्यात नाही तर कौटुंबिक भेटीतून तरी दोन भाऊ परत एकत्र दिसतात का? याकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचे आणि नागरिकांचेही लक्ष असेल.


इतर बातम्या
Join Whatsapp Group