महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. पुण्यातील इंजिनीअर विवाहितेने सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली ही घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. जो ऐकून तुमच्याही अंगाला काटा येईल. प्रेमविवाह केल्याची मोठी शिक्षा नाशिकच्या एका विवाहितेला मिळाली आहे.
नेमकं काय घडलं ?
पीडित युवतीचा एप्रिल 2025 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून तिचा सातत्याने छळ करण्यात येत होता, असा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. विवाह झाल्यानंतर गेल्या आठ महिन्यापासून सासरे ,सासू आणि दिराकडून छळ सुरू असल्याचा आरोप आहे. चोरीच्या आरोपामुळे तिच्या घरातील बेडरूममध्ये देखील कॅमेरे लावल्याचा तिच्या आईकडून दावा करण्यात आला आहे.
काल कुटुंबातील वादानंतर विवाहितेला सासरी बोलावण्यात आले. तेथे तिच्या नवऱ्याने मारहाण करत तिला विषारी औषध जबरदस्तीने पाजल्याचा आरोप आहे. घटनेनंतर गंभीर अवस्थेत असलेल्या विवाहितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपी नवरा पळून गेल्याची माहिती असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.