आजकाल कोणत्या गोष्टीसाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा काही नेमचं नाही. एक आई आपल्या लेकरासाठी आपल्या जीवाचं रान करते. आपल्या मुलासाठी ती वाट्टेल ते करायला तयार असते . परंतु हेच मूळ जर आईच्या जीवावर उठले तर...? अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
जयपूरमध्ये ४ जुलै रोजी महिला नीरज शर्मा ही गाडी अपघातात मरण पावली. पण पोलिसांना संशय आला. त्यांनी तपास करायला सुरुवात केली. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. त्या महिलेचा अपघातात मृत्यू झाला नव्हता, तर तिची हत्या करण्यात आली होती. हत्येची सूत्रधार दुसरं तिसरं कोणीही नव्हती, तर तिची पोटची मुलगी आयुषी, दीर मोहन आणि दीराचा मुलगा बलराम होते. जयपूर पोलिसांनी आज या हत्याकांडाचा खुलासा केला. पोलिसांनी आयुषी, मोहनसह ७ आरोपींना अटक केली आहे. बलराम फरार आहे. काँस्टेबल दयाराम आणि गणेश यांनी या प्रकरणाच्या उलगड्यात विशेष भूमिका बजावली.
जयपूर ईस्टचे डीसीपी रंजिता शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ४ जुलै रोजी प्रताप नगर पोलीस स्टेशन क्षेत्रात स्कॉर्पियोने धडक देऊन महिला नीरज शर्मा यांचा मृत्यू झाला होता. तपासात समोर आले की, हा अपघात नव्हता तर नियोजित हत्या होती. नीरज शर्मा यांचे पती एका कोर्टात LDC पदावर कार्यरत होते. एक वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. नंतर नीरज शर्मा यांना त्यांच्या पतीच्या जागी सरकारी नोकरी मिळाली होती. नीरज यांची मुलगी आयुषी (२४) आईची नोकरी मिळवण्यासाठी त्यांची हत्या करवून टाकली.
मुलीने रचली हत्येची कट
पोलिसांनी सांगितले की, आयुषीने तिचे काका मोहन आणि काकांचा मुलगा बलराम यांच्यासोबत मिळून हत्येचा कट रचला. त्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईक हेमंतला ७ लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर हेमंतने आपला साथीदार आकाश, अरविंद, रोहित आणि मोहित यांच्यासोबत मिळून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे. सर्व आरोपी भरतपूरचे रहिवासी आहेत.
महिलेच्या भावाला आला संशय
नीरज शर्मा यांच्या भावाला राकेश कुमार शर्मा यांना अपघाताची कहाणी थोडी खरी वाटली नाही. ते थेट पोलिसांकडे गेले आणि गुन्हा दाखल केला. त्यांनी दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांची भाची आयुषी शर्मा यांनी फोन करून अपघातात मृत्यूची माहिती दिली होती. राकेश यांनी सांगितले की, त्यांची बहीण बऱ्याच दिवसांपासून त्रस्त होती आणि अनेकदा फोन करून सांगायची की, तिची मुलगी, काका आणि काकांचा मुलगा मालमत्तेसाठी तिला त्रास देत होते.
हत्या झाल्याचा संशय व्यक्त
राकेश यांनी पोलिसांसमोर शंका व्यक्त केली की, त्यांच्या बहिणीचा मृत्यू अपघातात नाही, तर तिची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. घटनास्थळी चौकशी केल्यावर लोकांनी सांगितले की, एक वेगवान गाडी आली आणि तिने महिलेला जोरदार धडक दिली. नंतर पोलिसांनी गाडी आणि ड्रायव्हरला पकडून कठोर चौकशी केली. त्याने सर्व सत्य उघड केले आणि हत्याकांडाचा खुलासा झाला.