शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था केलेली असते. या स्कूलबसचे भाडे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दिले जाते. परंतु, आता विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला झटका बसणार आहे.
वाढत्या इंधन , बसच्या देखभाली खर्चाच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस मालकांनी शैक्षणिक वर्ष २०२५ साठी शालेय बस शुल्कात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांना या शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. राज्य सरकारने सरकारी बस भाड्यात १४.९५ टक्के वाढ जाहीर केली. त्यापाठोपाठ आता शालेय बसच्या शुल्कातही बस मालकांनी वाढ केली आहे.
मुंबईसह राज्यात अनधिकृतरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. त्यावर लगाम लावण्यात प्रशासनाला अद्याप यश आले नाही. त्यातच आता शालेय बसच्या शुल्कात वाढ झाली आहे.
बसच्या सुट्या भागांच्या किमतीत वाढ, देखभालीच्या खर्चात वाढ झाली असून चालक, महिला परिचारिका आणि व्यवस्थापकांचे वेतन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जीपीएस यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुरक्षा उपकरणे बसवण्याकरिता, वाहनतळच्या शुल्कात दुप्पट वाढ झाल्याने, आरटीओच्या दंडात वाढ अशा विविध कारणांमुळे शालेय बसमालकांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यामुळे आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी, विद्यार्थ्यांना सुरक्षित सेवा देण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५ मध्ये १८ टक्क्यांनी शुल्कवाढ करण्यात येणार आहे.