मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रूपयांची मदत जमा होण्यास सुरूवात झाल्याने बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असतानाच, महायुती सरकारची मात्र या योजनेला निधी मिळवताना चांगलीच दमछाक होत असल्याचे समोर आले आहे.
दोन कोटी लाभार्थींना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सरकारला इतर खात्यांचा निधी वळवावा लागत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. दोन्ही विभागांचे अनुक्रमे 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले. काल (शुक्रवारी) यासंबंधिचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या निर्णयानंतर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आल्याने खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.
...तर खातं बंद केले तरी चालेल
निधी वळवल्याच्या प्रश्नावरती बोलताना संजय शिरसाट म्हणाले, तुमच्या माध्यमातून कळले जवळपास सव्वाचारशे कोटी वर्ग करण्यात आले आहेत, याची मला कल्पना आणि माहिती नाही. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर खातं बंद केले तरी चालेल, असं म्हणत शिरसाटांनी संताप व्यक्त केला आहे. मला याची काहीच कल्पना नाही, याबाबत मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेल, फायनान्स डिपार्टमेंट आपली मनमानी चालवत आहे, आपण म्हणू तेच खरं म्हणत आहेत. या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही कट करता येत नाही, फायनान्स डिपार्टमेंटवाले आपले डोके जास्त चालवत असतील तर हे बरोबर नाही, हे स्पष्टपणे सांगतो. आदिवासी समाज कल्याण खाते कशासाठी निर्माण झालं आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत का? हे मला पटलेलं नाही, मुख्यमंत्री चर्चा करेल. माझे मागचे वर्षीचे दायित्व 1500 कोटी रुपयांचे आहे. इतर खात्याचे वर्ग झाले की काय माहिती नाही. मात्र, सामाजिक खात्याचे पैसे वर्ग झाले हे सत्य आहे, असं म्हणत खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.
तर पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, माझ्या खात्याचा निधी तुम्हाला इतर ठिकाणी वर्ग करता येत नाही, हा नियम आहे. कायदा आहे. फायनान्स काही जण बसले आहेत, त्यांना जर आपण हुशार आहोत असं वाटत असेल तर त्यांनी मला हे दाखवलं पाहिजे, आणि नियम द्या मला निधी वर्ग करता येतो म्हणून जर करता येत असेल तर मी त्यांची माफी मागेन, लाडकी बहिण लाडकी आहे, फायनान्समध्ये बसलेले शकुनी आहेत, त्यांनी केलेले हे काम आहे, असं म्हणत संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.