राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे ते विमानातून प्रवास करत होते. यावेळी तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी विमान थेट जमिनीवर कोसळले आणि यातच अजित पवार यांचा मृत्यू झाला. यावेळीअजितदादांसोबत असणारे त्यांचे सुरक्षा रक्षक, क्रू मेंबर आणि पायलट यांचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, विमान जमिनीवर आदळल्यानंतर क्षणात मोठा स्फोट झाला. दरम्यान, अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रासह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच त्यांच्या विमान अपघातावरून वकील नितीन सातपुते यांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे.
वकील नितीन सातपुते यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करताना म्हटलं आहे की, "अजित पवार यांचा विमान अपघात संशयास्पद वाटत आहे. या अपघाताची हायकोर्टाचे न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोगाकडून चौकशी होण्याची गरज आहे. या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आलं किंवा यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का? या सगळ्याबाबतही सीबीआयकडून चौकशी व्हायला हवी," अशी मागणी वकील सातपुते यांनी केली आहे.