लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गंत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखी दिलासादायक बातमी आहे.
आता योजनेतील महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून 40 हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील असून त्याबाबतचा विचार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात. ज्या बहिणींना उद्याोग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्याोगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.
राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेवर 45 हजार कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला, तरी विरोधक अफवा पसरवतात. पण बहिणींनी विरोधकांच्या या अफवांवर विश्वास ठेवू नये. ही योजना बंद होणार नाही, असे पवार म्हणाले.
तसंच, ते पुढे म्हणाले आहेत की, आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. काही बँका पुढे आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका चांगल्या आहेत. दरमहा दीड हजार रुपये भगिनीला जातात. त्याऐवजी 40 हजार रुपयांपर्यंत उद्योग, व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करुन द्यायचे व कर्जाचा हप्ता योजनेतून वळते केले जातील, असं अजित पवार म्हणाले आहेत.
50 हजार रुपयांचे भांडवल मिळाले तर बहिणी स्वतःचा व्यवसाय करु शकतील. त्यामुळं कुटुंब उभं करु शकतात, असंही अजित पवार म्हणाले आहेत.