मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमार्फत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आता योजनेत महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी महिलांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र या योजनेच्या एकूण २.४० कोटी लाभार्थी महिलांपैकी अद्यापही दोन-तृतीयांश महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे.
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने १८ नोव्हेंबर २०२५ ची अंतिम मुदत निश्चित केली आहे. यासाठी अवघे १२ दिवस उरले आहेत. सध्या केवळ ८० लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित सुमारे १ कोटी ६० लाख महिलांना वेळेत ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा, हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. ई-केवायसीसाठी मोठी समस्या विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांच्या केवायसीमध्ये येत आहे.
याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांच्या ई केवायसी करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी काम सुरू आहे. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तांत्रिक प्रणालीत सुधारणा करण्याचे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ई-केवायसीची मुदत १५ दिवसांनी वाढवली असली तरी, उर्वरित सर्व महिलांसाठी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत कायम आहे. त्यांनी सर्व पात्र महिलांना आवाहन केले आहे की, या मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांसाठी त्यांना अडचण येऊ शकते.