विदर्भात शिवसेनेचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आता 'प्रहार'चे बच्चू कडू यांच्यावर डाव लावला आहे. विधान परिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेत चढाओढ असताना, बच्चू कडू यांना सोबत घेऊन विदर्भातील भाजप आणि काँग्रेसच्या दबदब्याला शह देण्याची रणनीती आखली जात आहे.
मात्र, बच्चू कडूंच्या एन्ट्रीला शिवसेनेच्या अंतर्गत गोटातून विरोध होत असून, 'विलीनीकरण की केवळ युती' या पेचात ही निवडणूक अडकली आहे. या राजकीय समीकरणाचे नेमके काय फायदे-तोटे होतील, पाहा सविस्तर आढावा.
राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्याकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेतील अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातही नसलेल्या बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे.
एकनाथ शिंदेंकडून तसा प्रस्ताव बच्चू कडू यांना देण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेतील अनेक नेत्यांचा याला विरोध आहे. बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी द्यायचीच असेल तर त्यांना त्यांची प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करायला सांगावी, असा शिंदेंच्या सेनेतील नेत्यांचा आग्रह आहे. तसे घडल्यास एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
बच्चू कडू यांची विदर्भात त्यासोबतच राज्यभरात विविध ठिकाणी असलेली पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची ताकद लक्षणीय आहे. दिव्यांग, शेतकरी, मजूर यासारख्या घटकांपर्यंत पोहोचलेला नेता आणि विशेष म्हणजे विदर्भात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी बच्चू कडू यांचा विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून विचार सुरू असल्याची माहिती आहे.
बच्चू कडू प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करुन एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर शिवसेनेची विदर्भातील ताकद वाढेल. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे यापूर्वी दोन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे विदर्भ आणि अमरावती पट्ट्यात प्रहार संघटनेचे जाळे आणि बच्चू कडू यांची वैयक्तिक ताकद लक्षणीय आहे.
परिणामी बच्चू कडू शिवसेनेत आले तर शिवसेनेतील ताकद वाढू शकते. विदर्भात शिवसेनेची स्वत:ची अशी फारशी ताकद नाही. विदर्भात सध्याच्या घडीला भाजप आणि काँग्रेसचा दबदबा आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासारखा नेता शिवसेनेत आला तर विदर्भ आणि अमरावती पट्ट्यात शिवसेनेची ताकद वाढेल.
याशिवाय, बच्चू कडू यांची सामान्यांचे प्रश्न घेऊन लढण्याची आणि लोकांमध्ये मिसळण्याची राजकारणाची पद्धत ही एकनाथ शिंदे यांच्याशी मिळतीजुळती आहे.
याच सगळ्या गोष्टी लक्षात घेता बच्चू कडू हे शिवसेनेसाठी सर्वदृष्टीने लाभदायक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
बच्चू कडू यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास
* बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक. त्यामुळे त्यांच्या सार्वजनिक राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासून झाली.
* शिवसेनेचे चांदूरबाजार समितीचे सभापती झाले. सभापती असताना त्यांनी शौचालय घोटाळा उघडकीस आणला आणि तो प्रचंड गाजला. पुढे अपंगांना सायकल वाटप करण्यासाठी निधी न दिल्यामुळे त्यांचा शिवसेना नेत्यांशी वाद झाला आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले.
* बच्चू कडू यांनी 1999 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा थोड्या फरकानं पराभव झाला.
* 2004 साली लोकसभेची निवडणूकही त्यांनी लढवली आणि त्याही वेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
* त्यानंतर काही महिन्यांनी आलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी बाजी मारली. आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली.
* 2004 पासून सलग चारवेळा 2004, 2009, 2014 आणि 2019 ते अचलपूर मतदारसंघातून अपक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले.
* महाविकास आघाडीमध्ये असताना उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे सोबत बच्चू कडू शिंदे शिवसेनेसोबत गेले.
* मात्र, 2024 मध्ये झालेल्या पराभवानंतर शिवसेनेपासून बच्चू कडू हे काहीच दूर जात त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न दिव्यांगांचा प्रश्न लावून धरत सरकार विरोधात आंदोलने केली.