कॉकरोच जनता पार्टी सध्या चर्चेचा विषय बनली असून आता या संदर्भात एक नवीन अपडेट अमोर आली आहे. अवघ्या काही दिवसांतच कॉकरोच जनता पार्टी या डिजिटल चळवळीने सोशल मीडियावर लाखो-करोडो लोकांचे लक्ष वेधून घेतले. आता कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करणार असल्याचे समोर आले आहे.
प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी नुकताच एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेतून अभिजित दिबके यांनी त्यांना फोन करून संवाद साधला असून, या चर्चेतून अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. तरुणांचे आणि मुलांचे प्रश्न मांडण्यासाठी उभी राहिलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ आता मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत असून, याला देशभरातील अनेक नामवंतांची साथ मिळण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतून अभिजित दिबके यांनी फोन केल्यावर असीम सरोदे यांनी त्यांना महत्त्वाची सूचना केली. दिबके यांनी भारतात परतण्यापूर्वी येथील राजकीय परिस्थितीचा आणि संभाव्य धोक्यांचा अंदाज घेणे गरजेचे आहे. सरकार सूडबुद्धीने कारवाई करण्याच्या तयारीत असू शकते, त्यामुळे जर सर्व नियोजन पक्के असेल तरच त्यांनी भारतात यावे, असा सल्ला सरोदे यांनी दिला.
अभिजित दिबके यांचे भारतात येणे ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड ठरणार आहे. मात्र, सध्या त्यांच्या विरोधात ‘ते देशद्रोही कृत्य करत आहेत’ असा एक नॅरेटिव्ह जाणीवपूर्वक तयार करण्यात आला आहे. यामुळे भारतात पाऊल ठेवताच विमानतळावरूनच त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी, सरकार लगेच अटकेची घाई न करता, दिबके यांना जनतेचा किती आणि कसा पाठिंबा मिळतो याची प्रथम चाचपणी करेल, अशी शक्यता सरोदे यांनी वर्तवली आहे.
सध्याच्या व्यवस्थेत मुलांचे आणि तरुणांचे दुःख मांडण्यासाठी ‘कोकरोच पार्टी’ उभी राहिली आहे, अशी भावना अभिजित दिबके यांनी व्यक्त केली. यावर सरोदे यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी कोणतीही प्रक्षोभक भाषणे करू नयेत. आपल्या मागण्यांसाठी आणि आंदोलनासाठी त्यांनी महात्मा गांधीजींच्या शांततामय आणि अहिंसक मार्गाचाच अवलंब करावा.
या आंदोलनाची व्याप्ती मोठी असणार आहे. असीम सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या या घडामोडींमध्ये प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि अभिनेते प्रकाश राज हे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, पत्रकार निखिल वागळे आणि स्वतः असीम सरोदे यांनाही या निमित्ताने आमंत्रित करण्यात आले आहे. सध्या लोकांच्या मनात सरकारविरोधी मोठी खदखद आहे आणि तीच खदखद या आंदोलनाच्या आणि अभिजित दिबके यांच्या माध्यमातून बाहेर येत असल्याचे मत असीम सरोदे यांनी शेवटी नोंदवले आहे.