जुलै महिना सुरु होताच पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला असून आता अनेक जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट असून हाहाकार माजला आहे. तर काही जिल्ह्यांत पावसाची परिस्तिथी पाहता शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा तातडीचा निर्णय घेतला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुंबई–पुणे मार्गावरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काल रात्रीपासून मुंबई, पुणे आणि घाट परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळली असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
याचदरम्यान, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मंकी हिल घाट सेक्शनमध्ये दरड कोसळल्याने मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई–पुणे दरम्यान धावणाऱ्या तब्बल 16 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये इंद्रायणी एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस तसेच धुळे एक्सप्रेससारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.
याशिवाय, अहमदाबाद–कोल्हापूर एक्सप्रेस, अहमदाबाद–पुणे दुरंतो, बिदर–मुंबई एक्सप्रेस, नांदेड–पनवेल एक्सप्रेस, चेन्नई–मुंबई एक्सप्रेस, कोईमतूर–एलटीटी एक्सप्रेस आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या गाड्या कल्याण–इगतपुरी–मनमाड–दौंड या पर्यायी मार्गाने धावणार आहेत.
काही गाड्या त्यांच्या अंतिम स्थानकापूर्वीच थांबवण्यात आल्या असून, पुणे, पनवेल आणि इतर स्थानकांवरूनच त्यांची पुढील सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच रेल्वे स्थानकाकडे जाण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे घाट परिसरात बचाव आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, रेल्वे रुळांवरील माती आणि दगड हटवण्याचे काम सुरू आहे. परिस्थिती सामान्य होताच रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, पुढील अपडेट्स अधिकृत रेल्वे माध्यमांतून जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.