नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षात सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. पक्ष कोणाचा याबाबत वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाला शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. यामध्ये अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळण्यात आले असून 9 मंत्र्यांसह 31 आमदारांंविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत. शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले असून अजित पवार गटाने केलेले सगळे दावे फेटाळले आहेत. मंत्र्यांशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असून यातले चार विधान परिषद आमदार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. अजित पवारांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे. अजित पवार गटाला देखील आजच उत्तर दाखल करायचे आहे. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.
शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहे. पहिल्यांदाच अपात्र आमदारांचा आकडा समोर येत आहे. नऊ मंत्र्यांविरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केलेली आहे.मात्र या नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या शिवाय अजित पवार गटाने केलेले दावे देखील शरद पवार गटाने फेटाळले आहेत. 2022 मध्ये जी राष्ट्रीय कार्यकारणी झाली त्याचे देखील दाखले देण्यात आले आहे. त्या प्रक्रियांचे पालन करत माहिती निवडणूक आयोगात दिले होते.