.
महाराष्ट्रात भाजपने आपल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, अनेक जागांबाबत एकमत होत नसल्याने महायुतीत अद्याप जागा वाटप झालेले नाही.
दरम्यान, अजितदादा गटाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपाच्या नव्या फॉर्म्युलानुसार भाजप 30, राष्ट्रवादी काँग्रेस 7 आणि शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा येण्याची शक्यता आहे. मात्र, अजित पवार गट आणखी दोन जागा मागत आहेत. अजित पवार गटाच्या 6 जागांवरील उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे.
अजित पवार गटाच्या उमेदवार निश्चित झालेल्या जागांमध्ये रायगड, बारामती, शिरुर, सातारा, धाराशीव आणि परभणीचा समावेश आहे. यापैकी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यास उदयनराजे भोसले यांना भाजपकडून निवडणूक लढवता येणार नाही. आणखी 3 जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे वृत्त आहे.
अजितदादांकडून साताऱ्यातून रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. दोन दिवसानंतर राष्ट्रवादीची यादी येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे हे 6 उमेदवार निश्चित?
रायगड : सुनिल तटकरे
बारामती : सुनेत्रा पवार
शिरूर : शिवाजीराव आढळराव पाटील
सातारा : रामराजे नाईक निंबाळकर
धाराशीव : दाजी बिराजदार
परभणी : राजेश विटेकर