महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून लोकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागला आहे. मात्र आता या उकाड्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून राज्यात पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
येत्या 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. यंदा मान्सून वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झाला असून तो आता भारताच्या इतर भागात पोहोचायला सुरुवात झाली आहे. मान्सून दाखल होण्याआधी काही भागात प्री मान्सून पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार, मान्सून हा तळकोकणात पोहचला असून सातारा सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे शहराला देखील पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. येत्या २४ तासांत मौसमी वारे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा इशारा देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुबार, या जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, हिंगोली आणि परभणीतही पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागरपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सध्या राज्यभरात पाऊस कोसळत असला तरी, हा पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे जमिनीत ६ इंच ओलावा जाईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेऊ नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.