मुंबई : जम्मू - काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. निष्पाप नागरिकांवर गोळीबार करत त्यांना ठार केलं. हा हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेनंतर देशातील सरकारनेही कठोर कारवाई करत अनेक मोठे निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांनी ४८ तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले.
तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्र, मुंबईत राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांना तात्काळ भारत सोडण्याचं सांगितलं. यानंतर आता मुंबईत किती पाकिस्तानी वास्तव्यास आहेत, याची आकडेवारी समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. आज शनिवारी ९ पाकिस्तानी लोकांना भारत सोडून जाण्याचे कागदपत्र देण्यात येणार आहेत. इतर ३ पाकिस्तानी लोकांना उद्या रविवारी कागदपत्र दिली जाणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर ही कारवाई केली जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानविरोधात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. भारतातील पाकिस्तानी लोकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे पाकिस्तानात असलेल्या आपल्या भारतीयांना परत भारतात येण्याचं सांगण्यात आलं आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पाकिस्तानी लोकांना भारत सोडण्यासाठी कागदपत्र दिली जात आहेत.