गुजरातमध्ये बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. गुजरातच्या आणंद जिल्ह्यामध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळला. वडोदरा आणि आणंदला जोडणारा गंभीरा पूल अचानक नदीमध्ये कोसळला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार , पूल कोसळल्यामध्ये अनेक वाहनं नदीत पडली. या पुलावर अनेक प्रवासी देखील अडकले आहेत. हा पूल नेमका कशामुळे कोसळला याची माहिती समोर आली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती निवारण पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुलावर अडकलेले नागरिक मदतीची वाट पाहत आहेत. घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून नदीत पडलेल्या वाहन चालकांना आणि इतर जखमींचा शोध घेतला जात आहे. पुलावर अडकलेले नागरिक मदतीची प्रतीक्षा करत आहेत.
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे महिसागर नदीवरील गंभीरा पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी आणंद आणि वडोदरा यांना जोडणारा हा गंभीरा पूल अचानक कोसळला. त्यामुळे अनेक वाहने नदीत पडली तर काही वाहनं वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी बचावकार्य केले जात आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत.