कल्याण : महाराष्ट्रातील ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे काल (26 मे) कल्याणमध्ये एका 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

याशिवाय इतर 3 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी दोघे खाजगी रुग्णालयात दाखल आहेत तर एकावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.
मुंबई, पुणे आणि ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, कल्याणमध्ये एका 47 वर्षीय महिलेचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याने आता संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर गेलं आहे.
दरम्यान, ही परिस्थिती लक्षात घेता, केडीएमसी प्रशासन सतर्क झाले असून कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात 10 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. तर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात कोविड सोल्युशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, तर कोविड काळात घेतलेल्या सर्व खबरदारी पुन्हा स्वीकारा आणि आवश्यक आरोग्य नियमांचे पालन करा, असे आवाहन नगरपालिका अधिकारी प्रसाद बोरकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविड-19 च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सोमवार (26 मे 2025) राज्यात कोविड-19 च्या 56 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 210 वर पोहोचली आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. यापैकी मुंबईत सर्वाधिक 35 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर पुण्यात 8 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रासह देशातील इतर काही राज्यांमध्येही कोविड-19 च्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले असून, त्यापाठोपाठ तमिळनाडू आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
दिल्लीतही अलिकडेच रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. देशभरात गेल्या आठवड्यात 752 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एकूण सक्रिय रुग्णसंख्या 1000 च्या पुढे गेली आहे. केरळमध्ये 430, महाराष्ट्रात 210 आणि दिल्लीत 104 सक्रिय रुग्ण आहेत.