ब्राह्मण समाजाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परशुराम भवनाचं उद्घाटन नाशिक या ठिकाणी करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मी चित्पावन ब्राह्मण संघाचं मनापासून अभिनंदन करतो की परशुराम भवन ही सुंदर वास्तू बांधली आणि त्याचं उद्घाटन करण्याची संधी मला दिली त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. तुम्ही केवळ भवनच उभारलं नाहीत तर हॉस्टेलही उभारलं आहे. ज्यामध्ये ४० मुलांना राहण्याची व्यवस्था असेल. एनडीए किंवा तत्सम प्रोफेशनल परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन आणि मदत करण्याचा निर्णय जो घोषित झाला त्याबद्दल मी आपले आभार मानतो.
नाशिकला सकाळी आलो ते सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये आयोजित केला जाणार आहे त्यासंदर्भात. विविध पर्वण्यांच्या तारखांची घोषणा आज केली त्यानंतर इथे आलो. मला अतिशय आनंद आहे की ९३ वर्षे सातत्याने एखादी सामाजिक संघटना काम करते आहे. विविध प्रकल्प उभारत समाजाला एकत्र ठेवत, समाजातील गरजूंना मदत करत पुढे जाते अशी उदाहरणं कमी दिसतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चित्पावन ब्राह्मण संघ नाशिक यांचं पुस्तक मी पाहिलं. त्यामध्ये १९३३ ला सभा झाली होती त्याचंही इतिवृत्त वाचायला मिळालं. ज्ञातीच्या संस्था यासाठीच निर्माण करतो की त्या संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या चांगल्या लोकांचं एकत्रीकरण करता आलं पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास बघितला तर समाजाचं कुठलंही क्षेत्र काढून बघा, त्यामध्ये आपल्याला अग्रणी चित्पावन ब्राह्मण समाजाचे लोक पाहण्यास मिळतील असंही ते म्हणाले.
हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तयार केलं ते वाढवण्याचं काम असो, भारतीय स्वातंत्र्य लढा असो, समाजातील सुधारणा करण्याचं क्षेत्र असो, कला आणि साहित्य क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र पाहिलं तर त्या क्षेत्रातली १० ठळक नावं काढली तर त्यातली किमान तीन ते चार नावं चित्पावन ब्राह्मण समाजाची पाहण्यास मिळतात. कारण अतिशय बुद्धिमान आणि अतिशय मेहनती अशा प्रकारचा आपला ब्राह्मण समाज आहे असंही ते म्हणाले आहेत.