मुंबई आणि नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्गाचा (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग) शेवटचा टप्पा सुरू करण्याचा अखेर मुहूर्त ठरला आहे. गुरूवार, ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
यापूर्वी भिवंडी तालुक्यातील आमणे येथे उद्घाटनाची योजना होती. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमने या शेवटच्या ७६ किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. ५ जून पासून नागपूरहून थेट मुंबईच्या वेशीवर ८ तासात पोहचता येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सकाळी अकरा वाजता समृद्धीच्या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाने दिली आहे.
पूर्वी उद्घाटन कार्यक्रम ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे निश्चित करण्यात आला होता. मात्र आता हे ठिकाण बदलल्यामुळे श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
सुरुवातीला तिसऱ्या व शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण कुणाच्या हस्ते करायचे यावरुन श्रेयवाद होता. त्यामुळे १ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत होते. त्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन होते. मात्र तेही पुढे ढकलण्यात आले.
इगतपुरी-आमणे, भिवंडी या शेवटच्या व महत्वाच्या टप्प्याचे लोकार्पण रखडले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे ठरले होते.
मात्र प्रत्यक्षात आता ठिकाण बदलून इगतपुरीत शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होत असल्याने एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याला डावलून फडणवीस यांनी इतपुरीत लोकार्पण ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण २६ मे २०२३ ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या हस्ते तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.
दरम्यान, नाशिक-मुंबई हा प्रवास आता अवघ्या तीन तासांतच होणार आहे. तर मुंबई नागपूर अंतर आठ तासांत गाठता येईल. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई व नागपूर ही दोन मोठी शहरं जोडली गेली असून त्याचे अनेक फायदे होणार आहेत.