आज झालेल्या पत्रकार परिषदेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विविध विषयावर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते ज्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. याविषयावरही माणिकराव कोकाटे यांनी आज स्पष्टीकरण दिलं मात्र यावेळी पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली.
भिकारी शेतकरी नाही तर शासन आहे, असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलं होतं. शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं. आम्ही शेतकऱ्याला एक रुपया देत नाही. त्यामुळे शासनच भिकारी आहे. शेतकरी भिकारी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे.
एक रुपयाच्या विम्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच-साडेपाच लाख बोगस अर्ज माझ्याच काळात सापडले. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या. आतापर्यंत कमीत कमी 52 जीआर निघाले, इतक्या घोषणा मी केलेल्या आहेत असे माणिकराव कोकाटे आज म्हणाले. दरम्यान, स्पष्टीकरण देताना कोकाटेंची गल्लत झाली. मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना पुन्हा एकदा तंबी दिली आहे.