पुणे : संत तुकाराम महाराज यांच्या ३४०व्या पालखी सोहळ्याला आज, १८ जूनपासून सुरुवात होत आहे. देहू येथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
संत तुकाराम महाराज संस्थानकडून यंदाच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. चांदीच्या रथाला झळाळी देण्यात आली आहे. त्याचदरम्यान, आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. देहूत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना बाजूला ड्रोन पडलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तो ड्रोन जप्त केलाय, या प्रकाराने परिसरात एकच गोंधळ उडालेला आहे.
दरम्यान, आता आषाढी वारी निमित्ताने देहू परिसरात ड्रोनने विविध दृश्य घेतली जातात तसेच, विविध दृश्य चित्रीत केली जातात, आणि तो जो ड्रोन आहे तो फडणवीस बोलत असताना शेजारी पडला. तिथे उपस्थिती असलेल्या पोलिसांनी तातडीने जप्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन झालं. पादुकांची पूजा झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होत असून पहिला मुक्काम याच ठिकाणी असतो. दुसऱ्या दिवशी पालखी आकुर्डीच्या दिशेने रवाना होता.
तुकोबारायांच्या जयघोषात हजारो वारकरी आज प्रस्थान सोहळ्यासाठी देहुत जमले असून टाळ मृदुंगांचा गजर करताना दिसून आले.
दरम्यान, पादुका पूजन सोहळा सुरू असल्याने वारकऱ्यांच्या दिंड्या थांबवण्यात आल्या होता. त्यावेळी, वारकरी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. आता, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करत दिंड्या थांबविण्याचं कारण सांगितलं आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
देहुत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपला विचार हा वैश्विक विचार आहे. जगाला साद घालणारा आणि जगाला दिशा दाखवणारा विचार आहे.
त्यामुळे ह्या विचाराचा प्रसार जगभर होणं गरजेचं आहे. अर्थात जोपर्यंत वारी आहे, तो पर्यंत हा विचार संपणार नाहीच. कारण जो पर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत वारी असणार आहेच. मूलतत्त्व ठेवून आधुनिक मार्गाने संतांच्या विचाराचा प्रसार होणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकार भक्कमपणे पाठीशी उभं असेल.