मुंबईकरांसाठी आजची सकाळ एक हृदयद्रावक बातमी समोर आली. कसाऱ्याहून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून पडून 8 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लोकलच्या दरवाज्याला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले, त्यामुळे हा अपघात घडला.
या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत एक २३ वर्षीय तरुणीही गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल भाष्य केले आहे. दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.