भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटीमध्ये भारताचा सहा धावांनी विजय झाला आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडवर मात केली. ओव्हल कसोटी जिंकून भारताने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी बरोबरीत नेली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे ओव्हल कसोटीमध्ये भारताच्या विजयाचे शिल्पकार बनले आहेत.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून रंगलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा अखेर निर्णायक शेवट झाला. केनिंग्टन ओव्हल मैदानावर रंगलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवत मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. इंग्लंडसमोर 374 धावांचे विशाल लक्ष्य होते. पण हॅरी ब्रूक आणि जो रूट या दोघांनी मिळून इंग्लंडच्या विजयाच्या आशा प्रबळ केल्या.
दोघांनीही शतके ठोकून सामना भारताच्या हातातून निसटतो की काय, असा क्षण आला.पण शेवटी भारताच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंड संघाने गुडघे टेकले. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या जोडीने शेवटच्या सत्रात माऱ्याची धार वाढवली आणि इंग्लंडचा डाव 367 धावांवर आटोपला. या विजयाने भारताने केवळ सामना नव्हे, तर मालिकाही वाचवली.