क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा याला कर्णधारपद सोडावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा पुन्हा एकदा भारतीय संघात समावेश होणार आहे. मात्र यावेळेस कर्णधारपद रोहित शर्माकडे नसेल.

अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे यशस्वीपणे नेतृत्त्व करणारा आणि टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या रोहित शर्मा याला आता कर्णधारपदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. त्याच्याऐवजी शुभमन गिल याच्याकडे संघाची धुरा सोपवली जाईल.
एका खासगी वृत्तवाहिनीनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय संघाचा भाग असतील, परंतु कर्णधारपद शुभमन गिलकडे जाऊ शकते. हे भारतीय क्रिकेटविश्वातील मोठे स्थित्यंतर ठरणार आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना स्थान मिळणार आहे. या दोघांना शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली आणि युवा खेळाडुंचा भरणा असलेल्या भारतीय संघात खेळावे लागणार आहे.
ही मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत ते खेळू शकतील की नाही हे त्यांच्या परतीच्या फॉर्मवर अवलंबून असेल. भारतीय संघ 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात करेल. दुसरा एकदिवसीय सामना 23 ऑक्टोबर रोजी आणि तिसरा सामना 25 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर 29 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल.