मनमाड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पानेवाडी परिसरातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीमध्ये बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास धोक्याचे सायरन वाजू लागले. आपत्कालीन यंत्रणांची धावपळ सुरू झाली. कंपनीत आग लागल्याची वृत्त कानोकानी पसरले आणि नागरीकांच्या काळजाचा ठोका चुकला पण कंपनीतील यातायात पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंप स्टेशनजवळ लागलेली आग अवघ्या ८ मिनिटांत आटोक्यात आणली आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
पण ही खरोखर आग लागलेली नव्हती तर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहेत याची चाचणी घेण्यासाठी मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कंपनी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात एचपीसीएल अधिकाऱ्यांनी कंपनीची स्थापना, कार्य, सद्यस्थिती, स्टोअरेज, अत्याधुनिक यंत्रणा आणि सुरक्षा याचे प्रेझेंटेशन दिले. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी कंपनीमध्ये पंप हाऊसजवळ कर्मचारी साफ सफाईचे काम करत असतांना अचानक ठिणगी उडून आगीने भडका घेतला आणि धूर निघू लागल्याबरोबर धोक्याचे इशारे देणारे भोंगे वाजविण्यात आले.
कंपनीतील कामकाज म्हणजे टँकरमध्ये इंधन भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली. कंपनीचे आपतकालीन द्वार उघडण्यात आले. बचाव पथक, यातायात पथक, अग्निशमन पथक व सुरक्षा रक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंप हाऊस शेडवर चारही बाजूंनी पाण्याचे फवारे, फोम ऑपरेशन आणि तुषार सिंचन सोडल्यानंतर आग आटोक्यात आली. सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी जावून जीव धोक्यात घालून परिस्थितीची पाहणी केल्यानंतर सब कुछ ओके असल्याचा सिग्नल दिला.
हिंदुस्थान पेट्रोलियमचे वरीष्ठ प्रबंधक किरण मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे सुरक्षा अधिकारी आशिष मिश्रा, वरीष्ठ अधिकारी प्रितम सुर्यवंशी, इंकेश चौधरी, बीपीसीएलचे हर्षित शुक्ला, कैलास काळे, एचपीसीएलचे दिपक मिश्रा यांच्यासह मनमाड नगरपालिकेचे अग्निशमन पथक, सुरक्षा अधिकारी अमरेंद्र सिंग आदी यावेळी उपस्थित होते.