"...…तर राजकारणच काय, मी हा देश सोडून निघून जाईन" असं का म्हणाली कंगना रणौत
img
Dipali Ghadwaje
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणूक लढवत आहे. भाजपाने हिमाचल प्रदेशमधील मंडी इथून कंगनाला उमेदवारी दिली आहे. कंगना सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. अशातच अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनाला तिकिट मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यावरुन मोठा गहजब झाल्यानंतर ती त्यांनी डिलिट केली. आता कंगनाने राहुल गांधींना पप्पू म्हणत त्यांनाच आव्हान दिलं आहे. हिमाचलमधल्या मनालीमध्ये कंगनाने प्रचार सभा घेतली. त्यावेळी तिने राहुल गांधींना आव्हान दिलं आहे.

नेमकं काय म्हणाली कंगना?
“काँग्रेसचा विचार महिला विरोधी आहे. नवरात्र उत्सव सुरु असतानाही त्यांचा महिला विरोधी विचार समोर येतो आहे. मला जेव्हापासून तिकिट मिळालं आहे या काँग्रेसच्या लोकांना मिरची लागली आहे. माझा अपमान केला जातो आहे, मला कलंकित केलं जातं आहे. एक मोठा पप्पू दिल्लीत बसला आहे, आपल्याकडे एक छोटा पप्पू आहे. तो म्हणो मी गोमांस खाते, त्याच्याकडे व्हिडीओ आहे. त्याने व्हिडीओ दाखवावा, त्याच्याकडे पुरावा असेल तर त्याने तो सादर करावा. पण ते तो करणार नाही कारण तो छोटा पप्पू खोटारडा आहे. शक्तिचा विनाश करायचा आहे हे दिल्लीतला मोठा पप्पू (राहुल गांधी) म्हणतो. त्यामुळे या काँग्रेसच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार? ” असा प्रश्न कंगनाने विचारला आहे.

“माझ्यावर टीका केली जाते की मी अपवित्र आहे. मी देवभूमीत जायला पाहिजे. मला का अपवित्र, कलंकित ठरवलं जातं आहे. माझा महिला भगिनींना सवाल आहे या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांनी आपलं स्थान निर्माण करायचं नाही का? केंद्रात किती महिला मंत्री आहेत? राज्यांमध्ये किती महिला मंत्री आहेत? आपल्या मुलींचं भविष्य आहे का? तुमच्या मनालीची मुलगी म्हणजे मी स्वतःचं अस्तित्व शोधते आहे तर यांना मिरची का लागते? एकीकडे या प्रकारची घाणेरडी विचारधारा असलेले पुरुष आहेत. दुसरीकडे आपल्या सगळ्यांचे लाडके नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी महिलांनी राजकारणात यावं म्हणून ३३ टक्के आरक्षण दिलं आहे.” असं कंगनाने म्हटलं आहे.

मला धमक्या देणाऱ्या, आव्हान देणाऱ्या सगळ्यांना माझं खुलं आव्हान आहे, की राजकारण ही तुमची वडिलोपार्जित संपत्ती नाही. मला घाबरवून, धमक्या देऊन काही होणार नाही. हा नरेंद्र मोदींचा नवा भारत आहे. काही लोक माझ्याबद्दल बोलतात की येते आणि ढिंकचॅक करते. मी त्याला (राहुल गांधी) इथे बोलवू इच्छिते, त्याने माझ्या चित्रपटातला एक सीन मला करुन दाखवावा. तो सीन जर त्याने करुन दाखवला मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन. आपण कलेला निवडत नसतो, कला आपल्याला निवडत असते हे बोलणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असं कंगनाने म्हटलं आहे. मला म्हटलं जातं तुला काय राजकारण येतं का? त्या सगळ्यांना ४ जूननंतर आपोआप उत्तर मिळेल. असंही कंगनाने म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group