मित्रच बनले वैरी: चौथ्या मजल्यावरून ढकलून देत केली मित्राची हत्त्या
मित्रच बनले वैरी: चौथ्या मजल्यावरून ढकलून देत केली मित्राची हत्त्या
img
Jayshri Rajesh
वाढदिवसाच्या पार्टीत दारुवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी आपल्याच  मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे.  मित्राला चौथ्या मजल्यावरून ढकलून देत त्याची हत्त्या केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे .

चिंचपाडा परिसरात राहणारा कार्तिक वायाळ याचा  वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने मित्र निलेश क्षीरसागर,सागर काळे आणि धीरज यादव यांना पार्टी दिली. चिंचपाडा गावातील आर्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील निलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती. मात्र या पार्टीत दारुवरून वाद झाला. या वादात कार्तिक याने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. 

याचा राग आल्याने निलेश, सागर आणि धीरज या तिघांनी कार्तिक याला चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं. यात कार्तिकचा मृत्यू झाला. मात्र ही हत्या नसल्याचा बनाव  तिघांनी रचला. कार्तिकने निलेशच्या डोक्यात बाटली मारल्याने तो जखमी झाला होता. त्यामुळे आम्ही त्याला रुग्णालयात नेले. तिथून परत आल्यानंतर कार्तिक हा इमारतीच्या खाली मृतावस्थेत आढळल्याचे मित्रांनी सांगितले. 

कार्तिकच्या वडिलांनी या तिघांवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कार्तिकच्या हत्येची कबुली दिली.

याप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. वाढदिवसाच्या पार्टीतच कार्तिकची हत्या झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group