इंदापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी नको होती म्हणून गर्भपात केला आणि अर्भकाला जमिनीत पुरलं. गर्भपातानंतर अतिरक्तस्राव झाल्याने आईनेही जीव सोडला. ही धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावामध्ये घडली आहे. या घटनेमुळे इंदापुरमध्ये खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी महिलेचा पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पती आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली. फरार सासूचा पोलिस शोध घेत आहेत.
इंदापूरच्या वडापुरी गावामध्ये राहणाऱ्या ऋतुजा राहुल धोत्रे (२३ वर्षे) या गरोदर होत्या. त्यांच्या कुटुंबीयांना मुलाची अपेक्षा होती. पण गर्भलिंग चिकित्सेनंतर त्यांच्या पोटामध्ये वाढणारे बाळ मुलगी असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गर्भपात करण्याचे ठरवले. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून टाकले. पण गर्भपातानंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे महिलेचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी ऋतुजाचा भाऊ विशालने तक्रार दाखल केली होती. महिलेच्या गर्भपाताला कारणीभूत असणाऱ्या तिचा पती राहुल भिमराव धोत्रे (२८ वर्षे), सासू लक्ष्मी भिमराव धोत्रे आणि सासरे भिमराव उत्तम धोत्रे (५० वर्षे) यांच्याविरोधात इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक केली आहे. तर तिची सासू फरार झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे इंदापूरमध्ये खळबळ उडाली आहे.