अंबरनाथ : खंडणीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाच्या २० वर्षीय मुलाला फिल्मी स्टाईलने अडवून त्याचे अपहरण केल्याचा प्रकार अंबरनाथ शहरात समोर आला होता. यानंतर पोलिसांनी अतिशय वेगाने चक्रं फिरवत अवघ्या १२ तासात अपहरण झालेल्या मुलाची सुटका केली. पोलिसांनी १० अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचं कौतुक होतंय.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ४० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी अंबरनाथ पश्चिम भागात राहणाऱ्या बिल्डरचा २० वर्षांचा मुलगा मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी घरातून त्याच्या स्विफ्ट कारने साईटवर जाण्यासाठी निघाला होता. यावेळेस त्याच्या मागावर असलेल्या एर्टिगा कारमधील अपहरणकर्त्यांनी गाडी आडवी घालून त्याचं अपहरण केलं. यानंतर त्याच्याच फोनवरून वडिलांना फोन लावत तब्बल ४० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकारामुळे धास्तावलेल्या वडिलांनी थेट पोलिसांकडे धाव घेत याबाबतची माहिती दिली.
यानंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार बिल्डर वडिलांनी अपहरणकर्त्यांशी तडजोड करत खंडणीची रक्कम ४० कोटींवरून ७ कोटी आणि त्यानंतर २ कोटीवर आणत पैसे देण्याची तयारी दर्शवली. ओला कार बूक करा अन् पैसे पाठवा - त्यावर एक ओला कार बूक करून त्यामध्ये हे पैसे ठेवा आणि ती गाडी आम्ही सांगतो तिथे पाठवा, अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली. ही ओला गाडी अंबरनाथ एमआयडीसी, नेवाळी नाका आणि तिथून काटई नाक्याला अपहरणकर्त्यांनी बोलावून घेतली.
मात्र पोलिसांनी सापळा रचल्याचा संशय आल्यामुळे अपहरणकर्त्यांनी पैसे नको असल्याचं सांगत संपर्क बंद केला. त्यामुळे अपहृत मुलाला धोका निर्माण झाल्यानं पोलिसांनी तातडीने मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरणकर्त्यांचा शोध घेत भिवंडीच्या पडघा परिसरातून १० अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. तर याच परिसरातील पिसे धरण भागातून अपहृत मुलाचीही पोलिसांनी सुटका केली.
या अपहरणकर्त्यांकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल, ३ जिवंत काडतुसं, एक एअरगन, एक कोयता यासह ३ गाड्याही जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे अपहरण झाल्यापासून अवघ्या १२ तासात पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या आणि अपहरण झालेल्या मुलाचीही सुखरूप सुटका केली. यासाठी संपूर्ण ठाणे पोलीस दलातील १०० पेक्षाही जास्त अधिकारी कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे या कामगिरीनंतर पोलिसांचं कौतुक होतंय.