नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- लग्नाच्या वेळी बँकेत कॅशियर असल्याचे खोटे सांगून फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर, सासरच्या छळाला कंटाळून एका २३ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देवळाली गावातील वडारवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पतीसह दोघांना ताब्यात घेतले आहे.
राणी (नाव बदललेले) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती राजू गंगाराम पवार, अमोल राजू गायकवाड आणि सविता पवार यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरूणीचा विवाह अवघ्या दोन महिन्यांपूर्वी राजू पवार याच्यासोबत झाला होता. लग्न ठरवताना आरोपी राजू याने आपण एसबीआय बँकेत कॅशियर असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात तो एका मॉलमध्ये काम करत असल्याचे लग्नानंतर समोर आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आणि सासरच्या लोकांकडून होणार्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने २८ जुलै रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३१९(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पती राजू गंगाराम पवार (वय २७) आणि अमोल राजू गायकवाड (वय ३०, रा. राणे नगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सपकाळे करत आहेत.