राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून आता एकतर्फी प्रेमातून अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. या घटनेचं सध्या प्रमाण वाढ आलं असून ही बाब अतोषय गंभीर होत चालली आहे.
अमरावतीमध्ये महाविद्यालयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हे भयंकर हत्याकांड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिवसाढवळ्या भरचौकात तरुणीवर चाकूने सपासप वार करत तरुणीला आरोपीने जागीच संपवलं. या घटनेमुळे अमरावती शहरामध्ये खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील रवीनगर चौकात पावणे एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमाच्या विकृत मानसिकतेतून आणि ब्रेकअपच्या संतापातून एका तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थिनी शर्वरी गणेश हाडकेवर चाकूने सपासप वार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. रवीनगर येथील गजबजलेल्या चौकात घडलेल्या या थरारक घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत.
आरोपीचे गेल्या दोन वर्षांपासून हत्या झालेल्या तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय असून अलीकडेच तिने त्याच्याशी ब्रेकअप केल्याने तो प्रचंड संतापला होता. गुरुवारी दुपारी शर्वरी आपल्या दुचाकीने ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात जात असताना, मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या नराधम आरोपीने तिचा पाठलाग केला. रवीनगर चौकात त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपीने शर्वरीच्या मानेवर, पोटावर आणि छातीवर चाकूने अनेक वेळा वार केले. आपला जीव वाचवण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. पण आरोपी थांबला नाही.
यादरम्यान झटापटीत आरोपीचा मोबाईल आणि पाकीट घटनास्थळीच पडले. मात्र निर्दयी हल्लेखोराने तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडून घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त श्याम घुगे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शर्वरीला तातडीने बडनेरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या भयंकर हत्याकांडामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राजापेठ पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी रवाना झाली आहेत.