गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचं सत्र पाहायला मिळत आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद-वाशिम महामार्गावरील सत्तरमाळ घाटात कारचा भीषण अपघात भाविकांना देवदर्शनाहून घेऊन निघालेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट झाडावर आदळली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ४ ते ५ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी (ता. ७) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातं आहे. अद्याप मृतक आणि जखमी यांची नावे कळू शकली नाही.
दरम्यान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील ८ भाविक रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी माहुर गडावर गेले होते. दर्शन घेऊन पुसद मार्ग ते नगरकडे परतत होते. पुसद-वाशिम महामार्गावरील सत्तरमाळ घाटात कार आली असता, अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत दोन भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून जखमींना वाशिम आणी पुसद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.