राज्यातील राजकारणातील घडामोडींना वेग आला असून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह अनेक छोट्या - मोठ्या पक्षांना देखील दारुण पराभव सहन करावा लागला आहे. दरम्यान, अचलपूर विधानसभा मतदारसंघात अनपेक्षितरित्या बच्चू कडू यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

दरम्यान, अमरावती शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा माजी शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी व्यक्त केलीय. वर्ध्यात विनाअनुदानित शाळा शिक्षकांच्या समस्यांसाठी आयोजित मेळाव्याला आले असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढावी अशी अनेक शिक्षकांची इच्छा आहे. माझ्यासाठी शिक्षक संघटनांचा आग्रह आहे, परंतु उभं राहण्यापूर्वी सर्व मतदार शिक्षकांच्या घरोघरी जाऊन त्यांना विचारणार आहोत की, उभं राहू की नको. कारण माझा कुणी नेता नाही आणि आमचा कोणता मोठा पक्षही नाही. शिक्षकच आमचा नेता आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
शिक्षकांची मते जाणून घेतल्यावरच जुलै महिन्यात निवडणुकीला उभे राहायचे की नाही ते आम्ही ठरवू. शिक्षण ही काळाची गरज आहे, शिक्षण गरीबापासून दूर जाता कामा नये. त्यामुळे मी सध्या शिक्षक संघटना बांधतो आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले. सलग चार वेळा बच्चू कडू यांनी अचलपूरचा गड राखला होता. यंदा त्यांची पाचवी वेळ होती. परंतु प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करण्यात त्यांना अपयश आले.