आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी सकाळी प्रवासी बस आणि ट्रकच्या धडकेत पाच महिला आणि एका अल्पवयीन मुलासह १२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . तर या घटनेत २५ जण जखमी झाले आहेत. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 37 वरील डेरगाव येथे पहाटे 5 वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार गोलाघाट जिल्ह्यातील देरगाव परिसरात हा अपघात झाला आहे. बसमध्ये ४५ जण प्रवास करत होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सर्वजण पिकनिकसाठी निघाले होते. मात्र पहाटे ५ वाजेच्या सुमारास समोरुन येणाऱ्या ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. धडक इतकी जोरदार होती, बसचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व प्रवासी तिनसुकिया येथील तिलिंगा मंदिरात पिकनिकसाठी जात होते. जखमींना सध्या जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातात प्राण गमावलेल्या १२ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर जखमींमधील अनेकाची स्थिती नाजूक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याचा धोका वर्तवला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.