बीड जिल्हा हादरला; दोन भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू
बीड जिल्हा हादरला; दोन भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
दोन भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना बीड जिल्ह्यात घेतली आहे. कडा- धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला व्यंको कंपनीकडे वळण घेत असताना नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बीड नगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव नजीक बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडला. तर आज सकाळी सहा वाजता दुसऱ्या अपघातात आष्टी फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल उलटून सहा प्रवास्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक ( क्र. MH 21 X 8600 ) हा धामणगाव कडून अहमदनगर दिशेने जात होता. रात्री साडे अकरा वाजेदरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने (क्र. MH 16 Q 9507 ) जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, वय 35, रा. धामणगाव ता. आष्टी, मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे, दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर डाॅ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, वय 35, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी यांचा मॅक केअर हाॅस्पीटल, अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, वय 45, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर मॅक केअर हाॅस्पीटल अहमदनगर येथे उपचार चालु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच सपोनि. ढाकणे, पोउपनि. सातव, सफौ./रोकडे, पोशि/केदार, शिरसाट, चालक पोशि/कांबळे यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना अहमदनगर येथे दवाखान्यात रवाना केले. 

तर दुसऱ्या अपघातात मुंबई वरून बीडकडे जात असलेल्या सागर ट्रॅव्हल्स ताबा सुटल्याने सकाळी सहाच्या दरम्यान उलटल्याची घटना आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील आष्टा फाटा नजीक घडली आहे.यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अनेक जण जखमी झाले आहेत.

मुंबई वरून बीडकडे निघालेली सागर ट्रॅव्हल ही बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील आष्टा फाटा नजीक आज सकाळी सहाच्या दरम्यान उलटल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. 
 
जखमी वर आष्टी,जामखेड येथे उपचार सुरू असल्याचे बोलले जात असून आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दोन्ही अपघातानंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group