शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले
शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले "अरविंद केंजरीवालांना अटक झाली तर...."
img
Dipali Ghadwaje
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. स्वत: अरविंद केजरीवाल यांनी ही गोष्ट बोलून दाखवली आहे. ईडीकडून वारंवार समन्स बजावून देखील केजरीवाल चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
 
विरोधकांना घाबरवण्यासाठी केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा अंदाजही शरद पवार यांनी वर्तवला. शिर्डी येथील मेळाव्यात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. 

यावेळी शरद पवार म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत जनतेने केजरीवाल यांना मतदान करुन सत्तेवर पाठवले आहे. मात्र त्यानंतर आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. आता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठीही पावले उचलली जात असल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय.

अरविंद केजरीवाल यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. केजरीवाल स्वच्छ प्रतिमेचे आहेत हे दिल्लीतील सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्यांना अटक झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

केंद्र सरकारच्या कारवाईचा अर्थ असा आहे की, ज्यांचे राजकीय विचार भिन्न आहेत त्यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग करुन कारवाई करत दूर करण्याच प्रयत्न केला जात आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group