आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून अतिशय शुल्लक अशा कारणांवरून देखील गंभीर असे गुन्हे घडत आहेत. दरम्यान आता अशीच एक किरकोळ वादातून घडलेली धक्कदायक घटना समोर आली आहे.
मुंबईतील उपनगरी रेल्वेमध्ये एका किरकोळ वादाचे भीषण रूपांतर खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 22 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयंक लोहार (वय 22) असे मृत तरुणाचे नाव असून, अंधेरी ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाचे पाणी लोकलच्या डब्यात येत असल्याने मयंकने दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशाला दरवाजा बंद करण्यास सांगितले होते.
यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि आरोपीने संतापाच्या भरात मयंकवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मयंकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली आहेत. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, किरकोळ कारणावरून घडलेल्या या हत्येमुळे मुंबईच्या लोकल प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे.