“महाराष्ट्राचं सोनं कधीच लुटलं, उरली फक्त..…” - राज ठाकरे
“महाराष्ट्राचं सोनं कधीच लुटलं, उरली फक्त..…” - राज ठाकरे
img
Dipali Ghadwaje
आज दसरा सणाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘राजमुद्रा’ या पॉकास्टच्या माध्यमातून संबोधित केलं. यावेळी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं जनतेला महत्वपूर्ण आवाहन केलं आहे. हीच क्रांतीची वेळ आहे, असं राज ठाकरे म्हणालेत.

मतदानाच्या दिवशी तुम्ही मतांचं शस्त्र ठेवून देता. आणि नंतर ते शस्त्र बाहेर काढता. तुम्ही सर्वांना संधी देता. ज्यांनी सांभाळलंत त्यांनी तुमच्याशी प्रतारणा केली. शमीच्या झाडावरची शस्त्र उतरवा, हीच ती क्रांतीची वेळ, असं राज ठाकरे यांनी जनतेला संबोधून म्हटलं आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी योग्य व्यक्तीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.

आज दसऱ्या निमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात, तर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे, मनोज जरांगे पाटील यांचे मेळावे बीड येथे होणार आहेत. 

दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय धुमश्चक्री होत असताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. 

राज ठाकरे काय म्हणाले?

“महाराष्ट्राचं सोनं गेले अनेक वर्ष लुटलं जातंय. आम्ही फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटतोय. आपल्याकडे फक्त आपट्याची पानं उरलीयेत, सोनं दुसरेच घेऊन गेलेत. आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात मश्गूल तर कधी जाती-पातीत मश्गूल. आजचा दसरा निवडणुकीच्या तोंडावर असल्यामुळं खूप महत्त्वाचा आहे. आता बेसावध राहून चालणार नाही. दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय पक्ष आपापले खेळ करतात. महाराष्ट्राची प्रगती कुठं चाललीये? जरा बघा. नुसते रस्ते, पुल बांधले म्हणजे प्रगती होत नसते. मोबाइल, कलर टीव्ही हे गॅजेट्स आहेत, ती प्रगती नव्हे. प्रगती मेंदूतून व्हावी लागते. प्रगती समाजाची व्हावी लागते”, असं राज ठाकरे म्हणाले.
 
राज ठाकरे पुढं म्हणाले, “इतकी वर्ष राजकारण्यांनी प्रगतीच्या थापा मारूनही तुमच्याकडून राग व्यक्त होताना दिसत नाही. त्याच त्याच लोकांना दरवेळेस निवडून देता. त्यानंतर पश्चातापाचा हात डोक्यावर मारत राहायचा. आपण म्हणतो ना, पांडवांनी शमीच्या झाडावर शस्त्र ठेवली होती. जनताही मोक्याच्या वेळी शमीच्या झाडावर शस्त्र ठेवते. मतदानाचे शस्त्र मतदानाच्या दिवशी न वापरता, या सगळ्या लोकांना शिक्षा न करता शस्त्र ठेवून देता. मग निवडणुका झाल्या की, या लोकांवर बोलत राहता. पण मतदानाच्या दिवशी काय होतं? हा माझ्या जातीचा, हा माझ्या समाजाचा, हा माझ्या ओळखीचा…. असं करून राज्य उभे राहत नाही.”

“आज तुम्हाला संधी प्राप्त झाली आहे. तुम्ही सर्वांना संधी दिली. १३ तारखेला मनसेचा मेळावा होणार आहे, तेव्हा मी इतर गोष्टी बोलणार आहेच. पण दसऱ्याच्या निमित्ताने आज बोलत आहे. या निवडणुकीत मतदारांनी क्रांती केली पाहीजे. आजपर्यंत तुम्ही ज्यांना जोपासले ते तुमच्याशी प्रतारणा करत आले. तुम्हाला गृहित धरलं गेलं आणि हेच महाराष्ट्राचं अधिक नुकसान करत आलं आहे”, असंही राज ठाकरे म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group