पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू , आतापर्यंत महाराष्ट्रातील
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू , आतापर्यंत महाराष्ट्रातील "इतक्या" जणांनी गमावला जीव
img
Dipali Ghadwaje
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण 4 जणांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय.
 
मिळालेल्या माहितीनुसार , डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले 5 पर्यटक जखमी झालेत. तर एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे या हल्ल्यात जखमी झालेत. 

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे. या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 
  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group